बीड – दोन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड आणि गेवराई तालुक्यात घडली आहे .बिंदुसरा धरणावर दोन जणांचा तर सुरळेगाव येथे एक जण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला आहे .
ओंकार लक्ष्मण काळे (वय 16), शिव संतोष पिंगळे (वय 16, दोघेही रा. बीड) व तान्हाजी लिंबाजी आरबड (वय 17, रा. सुरळेगाव ता. गेवराई) असे मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील ओंकार काळे आणि शिव पिंगळे हे दोघेही, पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही घटना काल सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे सकाळी 8 च्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेला तानाजी आरबड या तरुणाचा देखील गोदावरी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.