मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ऑक्टोबर मध्ये सुरू झाल्या, आता पहिली ते चौथी चे वर्गदेखील दिवाळी नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने आराखडा तयार केला असून लवकरच याबाबत निर्णय झाल्यास शाळेत पुन्हा किलबिलाट ऐकू येईल .
राज्यातील बंद असलेल्या पाचवी ते बारावीच्या शाळा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्या.या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव न झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आता पहिली ते चौथी या वर्गाच्या शाळा देखील सुरू होणार आहेत .
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून १ ते १५ ऑक्टोबरदरम्यानच्या १५ दिवसांत राज्यभरात कोरोनाचे ३२ हजार ३१९ रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे ५० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचण्याची मोहीम जोरदार सुरू असल्याने मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. मुंबई महापालिका, नगर, पुणे, सोलापूर व सातारा जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे.
दरम्यान, सध्या शहरातील आठवी ते बारावीचे तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीच्या ऑफलाईन शाळा सुरू आहेत. राज्यातील जवळपास ४५ हजार शाळा सुरू झाल्या असून ६५ लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत दररोज हजेरी लावत आहेत. कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू आहेत. दुसरीकडे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू नाहीत. तरीही, कोरोनाचे नियम पाळून शहर-ग्रामीणमधील लाखो विद्यार्थ्यांना विशेषत: ज्यांच्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाइल नाहीत त्यांना ऑफलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. त्याच धर्तीवर आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.