पाटणा – एकीकडे मुंबईत शिंदे फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता अन दुसरीकडे बिहारमध्ये राजकीय भूकंप घडला.भाजपच्या 16 मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने नितीशकुमार सरकार कोसळल आहे.नितीशकुमार हे आता राज्यपालांची भेट घेऊन राजद सोबत सत्ता स्थापनेचा दावा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतलीय. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटणा येथील 1 आणे मार्ग आणि राजभवनची सुरक्षा वाढवण्यात आलीय. खरं तर, सीएम नितीश कुमार (Nitish Kumar) 1 आणे मार्गावरील निवासस्थानी जेडीयूच्या (JDU) सर्व खासदार आणि आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. बिहारच्या राजकारणासाठी ही बैठक खूप मोठी मानली जात आहे.
नितीश कुमार राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना राज्यपालांनी साडे बारा वाजता भेटीची वेळ दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, 1 आणे मार्गावर जेडीयू आमदार आणि खासदारांची बैठक सुरूय. यादरम्यान कोणत्याही लोकप्रतिनिधीला भ्रमणध्वनी घेऊन सभेला जाऊ दिलं जात नाहीय. सर्वांचे मोबाईल फोन बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, राजभवनाची सुरक्षा व्यवस्थाही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आलीय. आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात जाऊ शकतात, असं सांगण्यात येतंय.