नवी दिल्ली- देशाचे 15 वे राष्ट्रपती कोण असतील यासाठी सोमवारी 18 जुलै रोजी निवडणूक होत आहे.एनडीए कडून द्रोपदी मुर्मु तर आघाडीकडून यशवंत सिन्हा मैदानात आहेत.यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ही निवडणूक नेमकी कशी होते,एका आमदार ,खासदारांच्या मताला किती किंमत (वेटेज)असते याबाबत बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.जाणून घेऊ या नेमकी कशी असते ही प्रक्रिया .
राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो.विधान परिषदेच्या सदस्यांचा यामध्ये समावेश होत नाही. तसंच राज्यसभा आणि लोकसभेत नियुक्त करण्यात आलेले सदस्य या मतदान प्रक्रियेचा भाग नसतात.
महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचं मूल्य वेगवेगळं असतं. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मताचं मूल्य एक सारखंच असतं. पण वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या आमदारांच मूल्य वेगवगेळं असतं. ते त्या त्या राज्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं.
याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा राज्यातील एका आमदाराच्या मताला जास्त वेटेज तर मणिपूर, गोवा, त्रिपुरा सारख्या लोकसंख्येनी लहान असलेल्या राज्यांतील आमदारांच्या एका मताला कमी वेटेज असतं.
उत्तर प्रदेशातील एका आमदाराला 208 इतकं वेटेज असतं तर देशातील प्रत्येक खासदाराला 708 इतके वेटेज असतं.
त्या त्या राज्यातल्या आमदारांचं वेटेज किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या राज्यांची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येनं भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला नंतर परच 1000 नं भागलं जातं. त्यातून जो आकडा उत्तर म्हणून येतो तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचं वेजेट असतं. यासाठी 1971 ची जगगणना आधार मानली जाते.
1971 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या पाच कोटी, चार लाख होती. म्हणजेच 5 कोटी चार लाख भागिले 288 त्यातून येणाऱ्या संख्येला 1000 ने भागल्यानंतर 175 आकडा येतो म्हणजेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या मतांचं मूल्य हे 175 आहे.
भारतात एकूण 776 खासदार आहेत. त्यांचे वेटेज 5 लाख 49 हजार इतके आहे. भारतात विधानसभेतील आमदारांची संख्या 4120 इतकी आहे. त्यांचे वेटेज 5,49,474 इतके आहे. दोन्ही समूहांचे एकत्रित मतदान 10,98,882 इतके आहे. म्हणजेच अंदाजे 11 लाख.या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर होत नाही.
राष्ट्रपतीपदाची उमेदार व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्या व्यक्तीचं वय कमीतकमी 35 असावं.लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या सर्व पात्रतांची पूर्तता केलेली असावी.राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सादर करण्यासाठी पन्नास इलेक्टोरल कॉलेज प्रस्तावक आणि पन्नास इलेक्टोरल कॉलेज अनुमदेक गरजेचे असतात.
संघराज्यांच्या कार्यकारी अधिकारींची पूर्तता करणे हे राष्ट्रपतींचं मुख्य कर्तव्य आहे. लष्कराच्या प्रमुखांची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपती करू शकतात.
राष्ट्रपतींवर महाभियोग चालवून पदच्युत करता येऊ शकतं. यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. या प्रस्तावावर एक चतुर्थांश सदस्यांची सही असणं गरजेचं असतं. त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होते.
हा प्रस्ताव पारित करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतीयांश मतं मिळवण्याची गरज असते. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतीयांश मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला तर राष्ट्रपती पदावरून पदच्युत झाल्याचं मानलं जातं.