धारूर- कौटुंबिक कलहातून 28 वर्षीय मुलाने विष पिऊन आत्महत्या केल्यानंतर अवघ्या आठच दिवसात वडिलांनी देखील गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याने धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाप आणि लेकाच्या या निर्णयामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
धारुरच्या बस स्थानक परिसरात श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27 वर्षे) या युवकाने आठ दिवसांपुर्वीच शुक्रवारी (दि.8) विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरासह आसोला गावात एकच खळबळ उडाली होती. सदर युवकाने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असताना मृत तरुणाच्या वडिलांनी रात्री कोळपिंपरी शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे.
तरुणाने धारुर बस स्थानक परिसरात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. त्यावेळी तरुणाचे पिता मोहन पंढरी चोले (वय 50) हे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला गेलेले होते. घटनेची माहिती कळताच ते परतले होते. मुलाच्या आत्महत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाहीत तोच मोहन चोले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे आसोला गावात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, गावात उलटसुलट चर्चा होत आहेत.