परळी वैजनाथ -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला आहे.
दिनांक 22.10.2008 रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवुन दगडफेक करून बसचे समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व त्यास राज उर्फ स्वराज श्रीकांत ठाकरे यांनी चिथावणी दिली वगैरे मजकुरावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं 208/2008अन्वये गुन्हा कलम 143 427 336 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण जुने असुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे/पावडे यांनी दिला आहे.