अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील सततच्या पावसाचे सत्र कमी होताना दिसत नाही, त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा काठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या भागातील गावांना पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.
यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार व दिलासा देण्याबरोबरच संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आहे. पुन्हा पुन्हा पाऊस आल्याने आकडेवारी बदलत आहेत, मात्र नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यास मदत दिली जाईल या दृष्टीने संबंधित अधिकारी व विमा कंपनी यांना सूचना केलेल्या आहेत, असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
या दौऱ्यात त्यांनी राडी, राडी तांडा, तडोळा, धानोरा (बु.), पाटोदा (म.) आदी गावांना भेटी देऊन सोयाबीन, कापूस, ऊस आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पाटोदा येथील तुटलेला पूल तातडीने दुरुस्त करण्याबाबत ना. मुंडेंनी संबंधितांना निर्देश दिले. तडोळा ता. अंबाजोगाई येथील राम कदम यांचा मांजरा नदीच्या पात्रात शुक्रवारी वाहून जाऊन मृत्यू मुखी पडले होते. आज सकाळी एन डी आर एफच्या पथकाला त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. ना. धनंजय मुंडे यांनी कदम कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
घरातील एकमेव करता पुरुष गेल्याने त्यांच्या पत्नी श्रीमती ठकूबाई कदम यांच्यावर मुला-बाळांची जबाबदारी आली आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून प्रशासनाने गतिमान प्रक्रिया राबवत राज्य सरकारच्या वतीने कदम कुटुंबीयांना 4 लाख रुपये मदतीचा धनादेश अवघ्या पाच तासात आणला असून, ना. मुंडे यांच्या उपस्थितीत कदम कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.