
परळी – केवळ टिका अन विरोध करण्यापेक्षा केंद्रात सत्ता आहे त्याचा वापर परळीच्या विकासासाठी करावा असा खोचक सल्ला विरोधकांना देत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना आज सुरुवात झाली, परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे; मतदारसंघात दळणवळणाच्या सोयीसह इतरही विकासकामे जलदगतीने पूर्ण करू असे प्रतिपादन बीड केले .
अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी शहर बायपास या रस्त्याच्या 4 पदरी डांबरीकरणाचे व परळी ते धर्मापुरी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले, या कार्यक्रमात ते बोलत होते.
विरोधकांना सल्ला…
परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून, खोदलेले व पडलेले सर्व खड्डे बुजवून परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धुळमुक्त करू; असे आश्वासन ना. धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिले आहे. नगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी विकासकामांत राजकारण करू नये, उलट आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, असा खोचक सल्लाही ना. मुंडे यांनी नाव न घेता विरोधकांना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेला येत्या पाच वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल इतका विकास करून दाखवू, या ना. मुंडे यांनी दिलेल्या अभिवचनाची आठवण काढत ‘आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक आहोत’, अशी आठवणही ना. मुंडेंनी उपस्थितांना करून दिली.
दीड वर्षात ‘या’ शब्दांच्या पूर्तीकडे वाटचाल…
विधानसभा निवडणुकीच्या नंतर परळी मतदारसंघात ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी शहराच्या बायपास रस्त्याच्या कामास भरीव निधी उपलब्ध झाला असून, मागील सरकारच्या काळात अनेकवेळा केवळ भूमिपूजन झालेल्या बायपासच्या कामाला आता मात्र प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
परळी शहर बायपास सह, परळी ते धर्मापुरी या रस्त्याच्या कामाचेही भूमीपुजन झाले असून हे काम देखील 8 महिन्यांच्या आतच व तेही अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे अशा सूचना ना. धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदारांना चालू भाषणाच्या दरम्यानच दिल्या आहेत!
परळी ते तेलगाव या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरनाच्या कामाचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत असून या कामसही लवकरच गती मिळणार असल्याचे ना. मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
याशिवाय नगर परिषदेच्या माध्यमातून भुयारी गटार योजना तसेच अन्य विकास कामे शहरात सुरू असून काही प्रमाणात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, मात्र येत्या तीन महिन्यात खड्डे बुजवून त्यावरील रस्ते होते त्यापेक्षा चांगल्या दर्जाचे तयार करून संपूर्ण परळी शहर खड्डे व धुळमुक्त करू, असे नियोजन केले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनेक वर्षांपासून पाहिलेले पंचतारांकित एमआयडीसीचे काम आम्ही सत्तेत येतात पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत, नोटिफिकेशन निघाले, 35 हेक्टर जागेची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली, आता या जागेत नवनवीन गुंतवणूकदार आणून इथे उद्योगांना चालना देऊ, या भागात नवीन रोजगार निर्मिती करू; यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही ना. मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
थर्मल पवार प्लांट मधील काही संच कोळसा व अन्य अडचणींमुळे बंद करण्यात आले आहेत, मात्र आपण ऊर्जा विभागाशी याबाबत चर्चा केली असून, तितक्याच क्षमतेचे सोलार प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही ना. मुंडे म्हणाले.
मलकापूर ते वाका या भागातील 11 साठवण तलावांच्या पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा झाला असून या 11 साठवण तलावांच्या माध्यमातून या भागातील आणखी 35% क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या भागातला कोरडवाहू शेती करणारा शेतकरी बागायतदार व सधन व्हावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे ना. मुंडे म्हणाले.
परळी मतदारसंघातील रखडलेल्या प्रत्येक विकासकामांना येत्या काळात गती देऊन दिलेला पूर्ण शब्द करू, परळी शहर व तालुका समृद्ध करून इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचे उत्त्पन्न वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे व त्यापासून मी कधीही स्वतःला वेगळे करू शकत नाही, असे म्हणतच परळीचा लातूर व नांदेड शहरांच्या धर्तीवर विकास करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ना. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद केंद्रे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे यांनी केले.