नवी दिल्ली – डिजीटल पेमेंटमध्ये जशी वाढ होते आहे, तसं ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली असून अनेकांची स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक झाली आहे. हॅकिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून ओटीपी स्कॅमपासून सुरक्षित राहण्याचं सांगण्यात आलं आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सनेही अॅप्सद्वारे युजर्सचा डेटा लीक होत असल्याचं म्हटलं आहे.
टेलिकॉम ऑपरेटर्सला, युजर्सला KYC व्हेरिफिकेशनसंबंधी अनेक मेसेज येत आहेत. जर युजर्सनी केवायसी पूर्ण केलं नाही, तर 24 तासांत त्यांचा नंबर बंद होईल, असं मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. एअरटेल, वोडाफोन आणि जिओ युजर्सला अशाप्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणात येत आहेत.
अशाप्रकारे आलेला मेसेज कस्टमर केअरकडून आलेला असल्याचंही त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे, या मेसेजमध्ये अनेक स्पेलिंग मिस्टेक आणि इतरही चुका आहेत. कंपनीच्या नावाचं स्पेलिंग किंवा कंपनीचं नावही चुकीचं लिहिलेलं या मेसेजमध्ये दिसतं. त्यामुळे असा फ्रॉड मेसेज तुम्ही या चुकांमुळे ओळखू शकता.
टेलिकॉम कंपन्या कोणत्याही Unknown नंबरवरुन KYC बाबत चौकशी करत नाही, युजर्सचे कोणतेही पीन नंबर, आधार नंबर किंवा इतर कोणतीही पर्सनल माहिती टेलिकॉम कंपन्यांकडून विचारली जात नाही. त्यामुळे कोणत्याही नंबरवरुन कॉल आल्यास तुमची माहिती देऊ नका. तसंच कोणत्याही नंबर किंवा लिंकवर क्लिकही करू नका.
याप्रकरणी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने युजर्सला याबाबत इशारा देणारे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्याकडे कोणताही KYC बाबत मेसेज आल्यास, लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. या लिंक बनावट असून युजर्सची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्या तयार केलेल्या असतात. त्यामुळे सतर्क राहून कंपनीच्या अधिकृत अॅप किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करुन माहिती घ्या.