परळी –
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरूवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून पोस्ट पाकिटाचे विमोचन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथे तर गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे, खा. डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत एकाच वेळी करण्यात आले.
प्रारंभी गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या समाधीस अभिवादन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संचलन खा. प्रितमताई यांनी केले. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंडे साहेबांच्या कार्याचा गौरव केला. मुंडे साहेब एक उत्तम वक्ता, कुशल संघटक आणि मेहनती नेता होते. गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, वंचित, पिडितांचा ते आवाज बनले. जमिनीशी जोडलेला आणि नव नवीन विचार घेऊन काम करणाऱ्या या नेत्याने लोकांचे सुख दुःख त्यांच्या जवळ जाऊन जाणून घेतले. संसदेतील त्यांची कामगिरी देखील चमकदार होती. दीन, दलित, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी समर्पित होऊन काम केले. आज प्रत्येक कार्यकर्त्यांने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की,आमचे मार्गदर्शक, मोठे भाऊ मुंडे साहेब यांच्या कार्याचा गौरव करतांना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. त्यांचे अचानक जाणे आमच्यासाठी वेदनादायी होते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी धडपडणारा नेता आज आमच्यात नाही. ते आज असते तर देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या असत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताई गोरगरीबांसाठी काम करत आहेत. प्रितमताई देखील संसदेत चांगले काम करत त्यांची उणीव भरून काढत आहेत.
मुंडे साहेबांचे जीवन संघर्षमय होते. भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी काम केले. सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. आतापर्यंत ते लोकांच्या मना मनात होते आता इन्व्हलप च्या माध्यमातून घरा घरात जातील. भारतीय डाक विभागाने त्यांचा जो गौरव केला आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदीजी, नड्डाजी व केंद्र सरकारचे मी आभार मानते. ३ जून ते त्यांचा जन्मदिवस १२ डिसेंबर या दरम्यान प्रत्येकाने हे इन्व्हलप घेऊन त्यात मोदीजींनी आपली मन की बात सांगावी.असे पंकजा मुंडे यांनी म्हटले .