मुंबई – एप्रिल महिन्याच्या सुरवातीला लावलेले निर्बंध,माध्यन्हा पर्यंत कडक निर्बंध झाल्यानंतर आता 1 मे पासून पुन्हा पंधरा दिवसासाठी वाढवण्यात आले असून आता सध्या सुरू असलेले कडक निर्बंध 15 मे पर्यंत कायम राहणार आहे असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला .
कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत असले तरी राज्यातले कोरोना संकट अद्याप कायम आहे. राज्यात सहा लाख ७२ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. यामुळे महाराष्ट्रात १५ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. सामान्यांना रेल्वे, बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास मनाई आहे
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई आहे. खासगी वाहतुकीसाठी चालक आणि प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एवढ्या प्रवाशांना परवानगी. रिक्षात चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड होणार आहे. बसमध्ये उभ्याने प्रवासाला मनाई आहे तसेच खासगी बसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेलाच परवानगी आहे. प्रवासात ओळखपत्र बाळगण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
किराणा मालाची विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री, भाजीपाला विक्री, फळेविक्री तसेच अंडी, मटण, मासे चिकन यांची विक्री तसेच कृषी संबंधित उत्पादनांची विक्री आणि सेवा, पशूखाद्य विक्री, सर्व प्रकारच्या इंधनची विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत होणार आहे.
पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहक वाहने यांच्यासाठीची इंधन विक्री नियमित वेळेनुसार होईल. हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डीलिव्हरी रात्री आठपर्यंत सुरू राहील. धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, भाजीपाला तसेच फळे-फुले यांचे बाजार बंद राहतील. द्वार विक्री अथवा वितरणास परवानगी आहे. ऑनलाइन शॉपिंग सुरू राहील आणि होम डीलिव्हरी करता येईल.वाइन शॉप बंद असली तरी दारूच्या होम डीलिव्हरीला परवानगी आहे.
सरकारी, निमसरकारी आणि खासगी शिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लास बंद राहतील. सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. स्टेडियम आणि मैदाने प्रेक्षकांसाठी बंद तसेच व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी चालणे वा धावणे वा इतर व्यायाम बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद राहणार आहेत.