मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात करोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही असं मत व्यक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.महाराष्ट्र सारख्या राज्यात शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगत संस्थांना लसीकरण करण्याची परवानगी देण्याची मागणी राज यांनी केली आहे .
तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचं सांगताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करु द्यावं अशी पहिली मागणी केली आहे.
तसंच राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यासोबत सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे
करोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?,” असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.
“करोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल,” असं राज यांनी म्हटलं आहे.